![]() |
coronavirus | साडेतीन वर्षाच्या मुलाच्या मदतीला धावले रेल्वे प्रशासन, कार्गो ट्रेनमधून पाठवले दूध |
भारतीय रेल्वे प्रशासनाने मुंबईमधील एका महिलेला २० लिटर सांडणीचे दूध पोहचवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करुन एका महिलेने केलेल्या ट्विटनंतर ही मदत करण्यात आली आहे. माझं साडेतीन वर्षाचं मुलं स्वमग्न (Autistic) या दुर्धर आजाराने ग्रासलेलं आहे. त्यामुळे त्याला बकरी, गाय आणि म्हशीचे दूध चालत नाही. लॉकडाउनमुळे त्याच्यासाठी हे दूध हवे आहे, असं ट्विट मुंबईमधील या महिलेने केलं होतं.
आयपीएस अधिकारी असणाऱ्या अरुण बोथरा यांनी ट्विटवरुन यासंदर्भातील माहिती दिली. शनिवारी बोथरा यांनी केलेल्या ट्विटमध्ये या महिलेने केलेल्या मागणीनुसार तिच्या मुलासाठी सांडणीचे दूध पोहचवण्यात आल्याचे सांगितले. “२० लिटर सांडणीचे दूध (Camel Milk) शुक्रवारी रात्री रेल्वेच्या मदतीने मुंबईला पोहचले. या दुधाची मागणी करणाऱ्या कुटुंबाने मुंबईतील दुसऱ्या एका गरजू कुटुंबालाही मदत केली. या मदतीसाठी उत्तर-पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक (सीपीटीएम) असणाऱ्या तरुण जैन यांचे आभार. त्यांच्यामुळेच नियोजित नसणाऱ्या स्थानकावर गाडी थांबली आणि हे दूध पोहचवता आलं,” असं ट्विट बोथरा यांनी केलं आहे.
मुंबईतील रेणू कुमारी या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करुन एक ट्विट केलं होतं. यामध्ये तिने, “नरेंद्र मोदी सर माझ्या साडेतीन वर्षाच्या मुलाला स्वमग्नतेचा (Autistic) दुर्धर आजार आहे. त्याला अनेक अन्नपदार्थांची अलर्जी आहे. आम्ही त्याला सांडणीचे दूध आणि मोजकं खायला देतो. जेव्हा लॉकडाउन सुरु झालं तेव्हा आमच्याकडे सांडणीच्या दुधाचा पुरेसा साठा नव्हता. राजस्थानमधील साद्री येथून मला हे सांडणीचं दूध किंवा त्याची पावडर मिळवून देण्यासाठी मदत करा,” असं म्हटलं होतं. देशामध्ये १४ तारखेपर्यंत लॉकडाउन असल्याने या काळामध्ये सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद आहे. त्यामुळेच या महिलेला नेहमीप्रमाणे राजस्थानमधून मुंबईमध्ये दूध मागवणे शक्य नव्हतं. म्हणून तिने थेट पंतप्रधानांकडे मदत मागितली होती.
हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या ट्विटवर आपले आपले मत मांडले आणि सल्ले दिले. आयपीएस अधिकारी असणाऱ्या बोथरा यांनाही हे ट्विट पाहिल्यावर अॅडव्हिक फूड्स (Advik Foods) या कंपनीशी संपर्क साधला. सांडणीचे दूध बनवणारी ही देशातील पहिली कंपनी आहे. या कंपनीने सांडणीच्या दुधाची पावडर देण्यास होकार दिला. मात्र ती मुंबईला कशी पोहचवणार हा मोठा प्रश्न होता.
यासंर्भातील चक्र कशी हलली याबद्दल खुद्द जैन यांनीच पीटीआयला माहिती दिली. “बोथरा यांचे ट्विट पाहिल्यावर आम्हाला या प्रकरणाबद्दल माहिती मिळाली. मी अजमेर येथील रेल्वेचे अधिकारी (DCM) महेश चंदा जेवालीया यांच्याशी याबद्दल चर्चा केली. त्यानंतर आम्ही लुधियानाहून वांद्र्याला जाणाऱ्या ट्रेन क्रमांक ०००९०२ च्या माध्यमातून हे काम करण्याचं ठरवलं. यासाठी आम्ही ही ट्रेन राजस्थानमधील फालना रेल्वे स्थानकात थांबवण्याचे ठरवले. हा या ट्रेनचा अधिकृत थांबा नाही तरी आम्ही हा निर्णय फक्त हे पाकीट कलेक्ट करण्यासाठी घेतला. फालना येथून हे पाकिट ट्रेनमधील व्यक्तीकडे देण्यात आले त्यानंतर ते मुंबईतील महिलेपर्यंत पोहचवण्यात आलं,” असं जैन यांनी सांगितलं. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दुधाची पावडर पुरवणाऱ्या कंपनीला नियोजनाची माहिती दिली आणि पावडरचे पाकीट फालना स्थानकामध्ये रेल्वेच्या व्यक्तीकडे देण्यासंदर्भात कळवले.
“संबंधित प्रकरणाची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्याकडून ट्रेन थांबवण्याची परवानगी घेण्यात आली. नियोजित पद्धतीने हे दूध मुंबईतील गरजू महिलेपर्यंत पोहचवण्यात आलं. अशावेळी भारतीय रेल्वे आर्थिक फायद्याचा विचार करत नाही. ज्या प्रकारे आणि ज्या माध्यमातून लोकांना मदत करता येईल ती आपण केली पाहिजे असं आम्हाला सांगण्यात येत. उत्तर-पश्चिम रेल्वेच्या ट्रेन देशातील १८ जिल्ह्यांमधून धावतात. त्यामुळेच लोकांसाठी जे जे काही शक्य असेल ते आम्ही करत राहू,” असं जैन यांनी स्पष्ट केलं.
0 comments:
Post a Comment
Please add comment