![]() |
राज्य सरकार ९० एसटी राजस्थानला पाठवणार |
करोनामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी हे राजस्थानमधील कोटा येथे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून त्यांना आणण्यासाठी एकूण ९० एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी ९० एसटी बस सोडण्यात येणार असून एका एसटीमध्ये दोन चालक असणार आहेत. लांबचा प्रवास असल्यानं एका चालकावर ताण येऊ नये, यासाठी एका बससाठी दोन चालक असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी एसटीच्या काही विभागातील चालकांना या स्पेशल ड्युटीसाठी बोलावण्यात आल्यानं त्या चालकांच्या कुटुंबाने मात्र चिंता व्यक्त केली आहे. कोटा येथून हे विद्यार्थी आणताना आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन होणार आहे, अशी देखील माहिती आहे.
दरम्यान, आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा येथे जातात. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असतो. यावर्षी कोटा येथे शिकायला गेलेल्या जवळपास दीड हजार ते दोन हजार विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला. पहिला लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत संपणार होता. त्यावेळेस या विद्यार्थ्यांना १४ एप्रिलपर्यंत येथेच राहा, मग पुढे पाहू, असे तेथील शिक्षणसंस्थांनी सांगितले होते. यानुसार हे विद्यार्थी तेथेच थांबले. मात्र पुन्हा ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी चर्चा केली होती.
0 comments:
Post a Comment
Please add comment