![]() |
कट्टर शिवसैनिक राज ठाकरेंना साथ देणार |
सुहास दशरथे हे गेल्या ३८ वर्षांपासून निष्ठावंत शिवसैनिक आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सहसंपर्क प्रमुख म्हणून काम पाहिलं. एप्रिल २०२० मध्ये औरंगाबाद महापालिका निवडणूक होणार आहे. या परिस्थितीत मनसेनेही तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. लोकसभेला शिवसेनेचा औरंगाबादेत पराभव झाला होता, तर विधानसभेला सहा जागा जिंकल्या होत्या.
महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेनेला औरंगाबादेत मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी सुहास दशरथे मनसेत प्रवेश करणार आहेत. सुहास दशरथे हे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ते ‘कृष्णकुंज’वर मनसेचा झेंडा हाती घेतील.
सध्या औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. औरंगाबाद महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्याच ताब्यात आहे. यावेळी शिवसेनेसमोर भाजपचं आव्हान असेल, त्यातच मनसेही शिवसेनेला टक्कर देणार आहे. औरंगाबाद महापालिकेत सध्या शिवसेनेचे २९, भाजपचे २२ आणि एमआयएमचे २५ नगरसेवक आहेत.
राज ठाकरे यांचा नियोजित मराठवाडा दौरा नुकताच पुढे ढकलण्यात आला होता. पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे यांनी आखलेला मराठवाडा दौरा महत्त्वाचा मानला जातो. आपल्या अधिवेशनात प्रखर हिंदुत्वाची कास धरल्यानंतर मनसेने मराठवाड्याकडे लक्ष केंद्रीत करणे हे पक्षाच्या भविष्यातील वाटचाल कशी असेल याचे संकेत देणारी आहे.
हर्षवर्धन जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मराठवाड्यातील एकमेव आमदार होते. जाधव यांनी मनसेलवा अलविदा केल्यानंतर मराठवाड्यात पोकळी निर्माण झाली. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातही मनसे पुन्हा एकदा आपली ताकद निर्माण करत असल्याचं दिसत आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment