कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. अॅड. प्रदीप गावडे यांनी यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी चौकशी आयोगाकडं तसा अर्ज केला आहे. यावर आयोग काय निर्णय घेतो, याकडे सगळ्यांची नजर असणार आहे.
एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाचा आणि त्यात पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं होतं. या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठक घेतली होती. पण, त्यानंतर काही तासातच हे प्रकरण केंद्र सरकारनं ‘एनआयए’कडे सोपवलं. त्यावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यानंतरही याप्रकरणावर वारंवार भाष्य केलं आहे. दोन दिवसापूर्वीच पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर अॅड. प्रदीप गावडे त्यांची साक्ष घेण्याची मागणी केली आहे.
शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावं घेतली होती. “कोरेगाव भीमा हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षे एका ठिकाणी लोकं स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. या स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भेट दिलेली आहे. त्या काळात जे युद्द झालं. त्यावेळी पेशव्यांचा पराभव झाला होता. ब्रिटिशांच्या बाजुने काही भारतीयही होते हे यावरुन स्पष्ट होते. इथे दरवर्षी लोक येतात. इथले स्थानिक ग्रामस्थ इथे येणार्या लोकांना पाण्याची व्यवस्था करतात. स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्यांमध्ये कोणतीही कटुता नव्हती. मात्र, आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी फिरुन वेगळं वातावरण निर्माण केलं,” असं पवार म्हणाले होते. त्यावरून पवारांना या दंगलीबद्दलची ही माहिती कोठून मिळाली. त्यांच्याकडे आणखी काय माहिती आहे? याबद्दल त्यांची तातडीनं साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अॅड. प्रदीप गावडे यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment