![]() |
राम मंदिर निर्मितीचे काम सुरू होण्यापूर्वी मशीदीचे अवशेष हवेत |
रामजन्मभूमी-बाबरी मशीदीच्या वादग्रस्त जागेवरून बाबरी मशीदीचे अवशेष हटवावेत असे मुस्लीम पक्षाचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने राम मंदिराच्या निर्माणासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाची स्थापन केली आहे. या विश्वस्त मंडळाचे एकूण १५ सदस्य असणार आहेत. या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, मुस्लीम पक्षाला मशीदीसाठी ५ एकर जागाही देण्यात आली आहे.
बाबरी मशीद अॅक्शन कमिटीने बाबरी मशीदीच्या अवशेषांवर दावा केला असून त्यासाठी पुढील आठवड्यात कमिटीने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बाबरी मशीदीच्या अवशेषांवर दावा करण्याबाबत आम्ही आमचे वकील राजीव धवन यांच्याशी चर्चा केली असून या अवशेषांवर दावा केला पाहिजे, असे त्यांचेही म्हणणे असल्याचे बाबरी मशीद अॅक्शन कमिटीचे संयोजक जफरयाब जिलानी यांनी म्हटले आहे. पुढील आठवड्यात बैठक घेऊन ही प्रक्रिया आम्ही पुढे नेऊ असेही ते म्हणाले. बाबरी मशीदीचे अवशेष ठेवण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मला अयोध्येतील लोकांनी दिल्याचेही जिलानी म्हणाले.अयोध्येतील प्रसिद्ध मौलवी सैयद एखलाक यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बाबरी मशीदीचे अवशेष ठेवण्यासाठी योग्य जमीनीची पाहणी आम्ही केली असून त्या ठिकाणी हे अवशेष ठेवले जाऊ शकतील असे एखलाक म्हणाले. मुस्लिमांनी बाबरी मशीदीचे अवशेष गोळा केल्यास आम्हाला त्यावर कोणताही आक्षेप नाही. या मुळे बंधुत्व आणि सामाजिक सौहार्द मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया रामलल्लाचे मित्र त्रिलोकीनाथ पांडे यांनी म्हटले आहे.
अयोध्या प्रकरणी आपल्या पक्षकारांमार्फत आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या बाबरी मशीद सेलचे अध्यक्ष एस. क्यू. आर. इलियास यांनी म्हटले आहे. मंदिर निर्मितीचे काम सुरू होण्यापूर्वी वादग्रस्त स्थळावरून मशीदीचे अवशेष हटवणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
0 comments:
Post a Comment
Please add comment