शाळेतल्या धड्याचा आदर्श घेऊन वाचवले होते 13 जणांचे प्राण.
![]() |
मुंबईच्या झेन सदावर्तेला तर औंरंगाबादचा आकाश खिल्लारेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार |
राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची आज घोषणा झाली. देशातील 10 मुलं आणि 12 मुलींना हा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातील दोन मुलांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईतील झेन सदावर्ते ही मुलगी तर औंरंगाबादचा आकाश खिल्लारे यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
मुंबईतील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीतून दोन वर्षांपूर्वी झेनने 13 जणांचा जीव वाचवला होता. झेनने आग भडकली असताना प्रसंगावधान दाखवलं होतं. त्यावेळी शाळेत शिकवलेल्या धड्याचा तिला उपयोग झाला होता.आगीमुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण वाढतं. अशा परिस्थितीत गुदमरून मृत्यू होऊ शकतो. तेव्हा तोंडावर ओलं कापड ठेवल्यास श्वास घ्यायला त्रास होत नाही अशी माहिती झेन शाळेत शिकली होती. याच माहितीचा तिला आगीत अडकलेल्या 13 जणांचे प्राण वाचवण्यासाठी उपयोग झाला होता.
झेनसोबत औरंगाबादच्या आकाश खिल्लारेलासुद्धा शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्याने पाच वर्षाच्या मुलीसह तिच्या आईचा जीव वाचवला होता. आकाश शाळेला जात असताना मायलेकी नदीमध्ये बुडत असल्याचं दिसल्या होत्या. तेव्हा आकाशने कोणताच विचार न करता त्या दोघींना वाचवलं होतं.नदीवर कपडे धुण्यासाठी मायलेकी गेल्या होत्या. त्यावेळी मुलगी पाण्यात बुडाली म्हणून आईने तिला वाचवायला पाण्यात उडी मारली होती. मात्र आईसुद्धा बुडायला लागली. दोघी बुडत असल्याचे दिसताच आकाशने नदीत उडी मारून दोघींना सुखरूप बाहेर काढलं होतं. झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे यांना देशभरातील लहान मुले आणि मुलींसोबत हा पुरस्कार मिळणार आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment